निम्मे कामगार मूळगावी रवाना, पुणे मेट्रोचे काम लांबण्याची चिन्हं
पुणे : लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत मजूर, कामगार आपआपल्या गावी गेल्यामुळे पुणे आणि पिंपरीतील मेट्रो प्रकल्पांना फटका बसण्याची आहे. मेट्रोसाठी काम करणारे 50 टक्क्यांहून अधिक मजूर विशेष ट्रेनने गावी निघून गेले आहेत. त्यामुळे मेट्रो प्रकल्प लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
लॉकडाऊनमुळे 25 मार्चपासून सर्व कामं बंद आहेत. लॉकडाऊननंतर सर्व बंद झाल्यानंतर मेट्रोकडून मेट्रोसाठी काम करणाऱ्या सर्व मजुरांची 45 दिवस देखभाल करण्यात आली होती. पुणे आणि पिंपरीतील मेट्रो मार्गांसाठी सुमारे 2800 मजूर मेट्रोकडे होते. आता यामधले 50 टक्के मजूर आपल्या गावी निघून गेले आहेत.
मेट्रोसाठी काम करणारे हे सर्व मजूर उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड आदी ठिकाणांहून आलेले होते. लॉकडाऊनमुळे अनेक मजुरांनी आपल्या घरचा रस्ता धरला. त्यामुळे आता मेट्रोसाठी कामगार कमी पडत असल्यामुळे मेट्रोचे काम लांबणार असल्याची शक्यता आहे.
लॉकडाऊन दरम्यान अनेक कंपन्या, कारखाने बंद असल्याने मजुरांना पैसे मिळत नव्हते. तर काहींना कामावरुनही काढण्यात आले होते. त्यामुळे मजुरांच्या जेवणाचे हाल होत होते. या अशा प्रकारामुळे अनेक मजूर पायपीट करत घरी जाण्यास निघाले होत. तर काही जण सरकारने सुरु केलेल्या विशेष ट्रेनने घरी गेले.