निगडी-दापोडी बीआरटीला उच्च न्यायालयाचा ‘ग्रीन सिग्नल’
दहा दिवसात बस सेवा सुरु होणार
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी-दापोडी बीआरटी मार्ग सुरु करण्यास उच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. येत्या दहा दिवसात बीआरटी मार्गावरील बस थांब्याची स्वच्छता, बॅरिकेट्सची व्यवस्था, सुरक्षा रक्षकांसह किरकोळ कामे करुन महापाैरांच्या पाहणीनंतर बस सेवा तत्काळ सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे कित्येक वर्षे रेंगाळलेली बीआरटी सेवा नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिल्यानंतर सुरु होणार आहे.
दापोडी ते निगडी बीआरटी मार्ग महापालिकेने 2013 पासून विकसित केला आहे. दापोडी ते निगडी हा दुहेरी बीआरटीएस 12 किमी मार्ग करण्यात आलेला आहे. या मार्गावर एकूण 36 बस थांबे करण्यात आले आहेत. त्या सर्व बस थांब्याची कामे पुर्ण झालेली आहेत. या मार्गावर दर एका मिनिटाला एक बस धावणार असून दिवसभरात तब्बल 276 बसेस धावणार आहेत.
नागरिकांच्या सुरक्षेचा विचार न केल्याने या संदर्भात अॅड. हिम्मतराव जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. ग्रेडसेपरेटर मार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर दोन्ही बाजूने हा मार्ग विकसित केला असल्याने प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेतली नसल्याची जाधव यांची तक्रार आहे. याबाबत महापालिकेने आयआयटी पवई संस्थेकडून सुरक्षेबाबत केलेल्या उपाय योजनांची अमंलबजावणी केली आहे. तसेच दोन वेळा याचिकाकर्तेसमेवत बीआरटीएस चाचणीही घेतली. त्यांचा अहवाल महापालिकेने उच्च न्यायालयात सादर केलेला आहे. त्यावर 9 आॅगस्ट 2018 सुनावणी होवून हा बीआरटी मार्ग कार्यान्वित करण्यास मान्यता मिळालेली आहे.
बीआरटी मार्गावरील अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स दुरुस्ती करण्यात येणार आहेत. बस थांब्याची स्वच्छता व किरकोळ कामेही पुर्ण होणार आहेत. वर्दळीच्या ठिकाणी बीआरटी बॅरिकेटस उभे केले गेलेले नाहीत. त्या ठिकाणी बस ‘नॉन बीआरटी लेन’मधून धावणार आहे. बीआरटी मार्गावरील ‘मर्ज इन’ व ‘मर्ज आऊट’ तयार केला आहे त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, मेट्रोची मार्गिका सर्व्हिस लेनच्या बॅरिकेट्सबाहेरून घेतली जाणार आहे. त्यामुळे मेट्रोचे पिलर बॅरिकेट्सच्या बाहेर असतील. बीआरटी बसला अडथळा होणार नाही. मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडून बीआरटी मार्ग पूवर्वत करून दिला जाणार आहे. उच्च न्यायालयाकडून ‘हिरवा कंदील’ मिळाल्याने हा मार्ग कार्यान्वित केला जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आयआयटी पवईच्या तज्ज्ञांच्या अहवालानुसार सर्व सुरक्षा उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे लवकरच बीआरटी मार्ग सुरु करण्यात येणार आहे.