नागरिकांनो… आला पावसाळा, आरोग्य सांभाळा
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
कोरोना प्रादुर्भावाने पिंपरी चिंचवडकर हैराण असतानाच शहरात अनेक साथीचे आजार डोके वर काढू लागले आहेत. शहरातील खासगी व महापालिका रुग्णालयात ताप-थंडीसह अन्य साथीच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे साथीचे आजारांचे बळावण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. घरातील प्यायचे पाणी, अन्य पाण्यांच्या शुद्धतेबद्दल खात्री देता येत नाही. त्यामुळे अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरु लागले आहेत. लहान मुलांसह मोठ्यांना देखील त्याची बाधा झालेली आहे. शहरातील साचलेल्या पाण्यामुळे मलेरियाचा फैलावही वाढण्याचा धोका अधिक आहे.
पावसाळ्यात संसर्गाची भीती अधिक असते. दूषित पाण्यामुळे रोगराई झपाट्याने वाढत असते. ही रोगराई अधिक पसरू नये, यासाठी स्वच्छता ठेवणे हाच सर्वात मुख्य प्रतिबंधक उपाय आहे. आपल्या राहत्या परिसरात कचरा व पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यायला हवी. प्रकाशाची तूट असल्याने वातावरणातील जीवजंतूंचा नायनाट होत नाही. परिसरात कचरा व पाणी साचणार नाही, याची दक्षता घेतल्यास मलेरिया आणि डेंग्यूच्या डासांची निर्मिती होणार नाही, रोगराईला आळा बसेल.
पावसाळ्यात काय घ्यावी काळजी…
आपले घर, परिसर स्वच्छ ठेवा. घरात ओला व सुका कचरा वेगळा ठेवा. भांडी, कपडे ओलसर ठेवू नका. स्वयंपाक करण्याची जागा स्वच्छ व निर्जंतुक साबणाने स्वच्छ करून घ्यावी. लहान मुलांची खेळणी आठवड्यातून एकदा निर्जुंतक पाण्यातून विसळून घ्यावीत. पावसाळ्यातील हे आजार टाळण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून पिणे आवश्यक आहे. घराच्या भोवती कुंड्या लावल्या असतील तर पावसापूर्वी त्याची छाटणी करावी, घरामध्ये झाडे लावू नयेत. यात पाणी साठून डासांची पैदास वाढते. घरात डोअरमॅटमध्येही पाणी राहिल्यास त्यातही डासांची पैदास होण्याची शक्यता असते. पिंपामध्ये, मोठ्या भांड्यामध्ये साठवणूक केलेले पाणी एका दिवसांच्या वर साठवून ठेऊ नये. त्यात डास वाढतात. जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, उघड्यावरील अन्न पदार्थ आणि शिळे अन्नपदार्थ खाऊ नये.
पाण्यातून प्रादुर्भाव होणाऱ्या आजारांमधील सामायिक लक्षणे – सतत उलट्या, जुलाब होणे, ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, गळून गेल्यासारखे होणे. स्त्रियांमध्ये हात-पाय खूप दुखणे, मुलांमध्ये पोट दुखण्याचा त्रास जाणवतो. शौचामध्ये आमांश पडणे, तापाची मुदत वाढत जाणे, डोळे लालसर होणे, खूप थकवा येणे
तत्काळ उपचार घ्यावेत…
कोणताही आजार अंगावर काढू नयेत, घरगुती औषधांवर चालढकल न करता नजीकच्या महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यावा. औषधांचा पूर्ण कोर्स घ्यावा, गरज पडल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तचाचणी करावी. तसेच हलका आहार घ्यावा. भाताची पेज, सरबत, ताक, डाळीचे पाणी आदी भरपूर प्रमाणात सेवन करावे. काॅलरा, टायफाॅईड, गॅस्ट्रो, कावीळ आजारांचे रुग्णांबाबत खासगी डाॅक्टरांनी पालिका रुग्णालयास तत्काळ माहिती द्यावी. – डाॅ. पवन साळवे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी