देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डावर आमदार शेळके यांचा धडक मोर्चा
![MLA Shelke's strike on Dehuroad Cantonment Board](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/18da1396-edcf-4d39-b3f4-cc3d2b354fa2.jpg)
देहू – देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या वतीने जनतेच्या रास्त मागण्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामध्ये बोर्डातील सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केला.
निवडणूका आल्या की नारळ फोडायचे आणि नंतर दुर्लक्ष करीत शहरातील नागरिकांची केवळ दिशाभूल करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केला जात असल्याची टिकाही त्यांनी केली.
देहूरोड शहरातील विविध मागण्यांकडे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने आज दुपारी कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे -मुंबई महामार्गावर ऑर्डनन्स फॅक्टरी प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यावेळी आमदार शेळके यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
शहरातील जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या सहा महिन्यांपासून बोर्ड प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. सिद्धिविनायकनगरीचा पाणीप्रश्न निधी मंजूर असुनही १५ वर्षांपासून प्रलंबित आहे. तो कायमस्वरूपी सोडवावा. बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात गोरगरिबांना अद्ययावत वैद्यकीय सुविधा मिळल्या पाहिजेत, रेल्वे उड्डाणपुलाचे काम मार्गी लागले पाहिजे, अशा अनेक मागण्या आमदार शेळके यांनी यावेळी केल्या.
दरम्यान, आमदार शेळके यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ व आंदोलकाची कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरूप हरितवाल यांनी आंदोलन स्थळी भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.
“माझ्या पातळीवर जेवढ्या समस्या सोडविता येतील, तेवढ्या मी सोडवितो. बाकीच्या कामांसाठी संरक्षण विभागाची परवानगी लागते ती मिळविण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यांच्याकडून लवकरच परवानगी मिळणार आहे. ती मिळाल्यास लवकरच कामे सुरू केली जातील.तसेच सिद्धिविनायकनगरी पाणी प्रश्न फेब्रुवारी अखेरपर्यंत सोडविला जाईल” असे सीईओ रामस्वरूप हरितवाल यांनी सांगितले.