थेरगावात दहा कावळ्यांचा विषबाधेने मृत्यू; संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – थेरगावातील बापुजीबुवा मंदिर परिसरातील उद्यानात दहा कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अन्नातून विषबाधा झाल्याने कावळ्यांचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेतील पशु वैद्यकीय विभागाच्या कर्मचा-यांनी कावळ्यांच्या मृत्युचे कारण तपासले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे थेरगाव येथे बापुजीबुवा मंदिर परिसरात उद्यान आहे. याठिकाणी ज्येष्ठ नागरिकांबरोबरच लहान मुले फिरायला येतात. आज सकाळी उद्यानात कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे आढळले. त्यावर प्राणी मित्रांनी ही बाब नगरसेवक कैलास बारणे यांच्या कानावर घातली. त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यांनी तत्काळ महापालिकेच्या पशू वैद्यकीय विभागाला याबाबत माहिती कळविली. त्यावर पशुवैद्यकीय विभागाचे कर्मचारी जाग्यावर पाहणी करण्यासाठी आले. त्यांनी सर्व मृत कावळ्यांना एकत्र करून पोस्ट मार्टेम करण्यासाठी घेऊन गेले.
सामाजिक द्वेशापोटी विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तीने कावळ्यांना वीष मिश्रित अन्न पदार्थ खायला टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे कावळे अन्य ठिकाणी मृत पावले असून त्यांना वरील ठिकाणी आणून टाकले असल्याची शक्यता पालिकेच्या पशु वैद्यकीय विभागाने वर्तविली आहे.
मृत कावळ्यांची प्राथमिक तपासणी केली असता अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. विषबाधेने कावळे मृत पावून 24 तास उलटल्याचे स्पष्ट होत आहे. औंध येथील शासकीय पशु वैद्यकीय उपचार विभागात पुढील तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील.
घनश्याम पवार, पशु वैद्यकीय विभाग
थेरगाव परिसरात घाटावर दहावा घालण्यासाठी कावळ्यांची वाट पहावी लागते. आपल्या धार्मिक विधीनुसार कावळ्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. असे असताना दहा कावळ्यांचा एकाच वेळी मृत्यू होणे संशयास्पद आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. प्रशासनाने याची चौकशी केली पाहिजे.
कैलास बारणे, गटनेते, पिंपरी-चिंचवड मनपा