च-होलीत डोक्यात दगड घालून महिलेचा खून, दोघांना अटक
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – दामदुप्पट रक्कम परत देण्याच्या नावाखाली दिलेले व्याजाचे पैसे परत मागणा-या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याने दिघी परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना च-होली बुद्रुक येथे शनिवारी (दि. 16) घडली आहे. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
स्वप्नाली गिरीधारी सोनावणे (वय 34, रा. परांडेनगर, दिघी), राधेश्याम रामनिवास कोरी (वय 40, रा. भगवाननगर, वडगाव रोड, आळंदी) या दोन आरोपींना अटक केली आहे. सुनंदा जगन्नाथ वाळके (वय 58) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनंदा यांच्या दिघी, परांडेनगर येथे खोल्या आहेत. त्या भाड्याने दिल्या आहेत. एका खोलीत आरोपी स्वप्नाली तीन वर्षांपासून राहत होती. तिचे पती सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. स्वप्नाली दामदुपटीचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे घेत. त्यातच तिने सुनंदा यांच्याकडून काही रक्कम वर्षभरात दुप्पट देण्याच्या अटीवर घेतली. पैसे घेऊन वर्ष उलटले तरी पैसे परत मिळत नसल्याने सुनंदा यांनी स्वप्नालीकडे वारंवार पैसे मागण्यास सुरुवात केली.
त्याला कंटाळून स्वप्नालीने सुनंदा यांना मारण्याचा कट रचला. तिने रिक्षाचालक राधेश्याम याच्या मदतीने गुरुवारी (दि. 14) एकजण पैसे घेऊन येणार असल्याचे सांगून स्वप्नालीने सुनंदा यांना सोबत घेऊन चिखली, मोशी, देहूरोड, तळेगाव, चाकणरोड भागात फिरवले. मात्र, त्या दिवशी तिला संधी साधता आली नाही. पुन्हा शनिवारी तिने राधेश्यामच्या सोबतीने त्याच्या रिक्षातून च-होली येथे एका शेतात नेले. जाताना आरोपीने दुपारच्या जेवणासाठी वडापाव घेतला. दुपारी वडापाव खात असताना आरोपीने सुनंदा यांच्या डोक्यात दगड घालून आणि चाकूने वार करून खून केला. दिघी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने तपास करत आरोपींना अटक केली.
याचा तपास पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक काळुराम लांडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र राठोड, पोलीस कर्मचारी दीपक खरात, राजेंद्र शेटे, प्रमोद लांडे, प्रमोद वेताळ, सचिन उगले, अमित गायकवाड, महेंद्र तातळे, सावन राठोड, गणेश सावंत, प्रवीण पाटील, प्रमोद हिरळकर, सुनील चौधरी, गणेश मालुसरे, तानाजी पानसरे, अरुण गर्जे यांच्या पथकाने केला.