डॉक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, प्रहार संघटनेचे सांगवी जिल्हा रुग्णालयात धरणे आंदोलन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/6-6.jpg)
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|
अपंग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्रात गैरप्रकार होत असून संबंधित डाॅक्टराकडून नाहक त्रास दिला जात आहे. डाॅक्टराच्या चुकीच्या प्रमाणपत्रामुळे अपंग व्यक्तींना विविध शासकीय योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे चुकीचे प्रमाणपत्र देणा-या डाॅक्टरवर तात्काळ निलंबनाची कारवाई करा, या मागणीसाठी प्रहार संघटनेच्या वतीने सांगवी रुग्णालयात आज (बुधवार) धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, अपंग व्यक्तीच्या प्रमाणपत्राचे पुर्नतपासणी करुन अस्थीव्यंगाचे नव्याने प्रमाणपत्र देण्यात आले.
पिंपरी चिंचवड प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात विविध प्रश्नाबाबत आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे शहराध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रमेश पिसेे, ज्ञानेश्वर गायकवाड, रामचंद्र तांबे, अशोक भोपळे, बाळू घुगे, विद्या तांदळे, राजाराम पाटील यांच्यासह दीडशेहून अधिक अपंग बांधव उपस्थित होते.
जिल्हा रुग्णालय सांगवी येथे अपंगांच्या प्रमाणपत्राबाबत होणाऱ्या गैरप्रकाराबाबत हे आंदोलन करण्यात आले. हर्षल कदम या नऊ वर्षीय मुलाला ५४% टक्क्याचे अस्थीव्यंगाचे सर्टिफिकेट देण्यात आले होते. या प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करून संबंधित डॉक्टरवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, या आंदोलनाची तत्काळ दखल घेवून रुग्णालय अधिष्ठाता यांनी हर्षल कदम यांची पॅनल डॉक्टरला बोलवून त्याची पूर्णता तपासणी करण्यात आली. त्यांना नवीन सर्टिफिकेट देण्यात आले. या पॅनलमध्ये डॉक्टर खान, बालरोग तज्ञ डॉक्टर बिराजदार, त्वचारोग डॉक्टर संतापुरे, आणि अस्थिरोग तज्ञ डॉक्टर गरड या पॅनल डॉक्टरने पुर्न तपासणी करून ताबडतोब त्यांचा अहवाल देण्यात आला. तसेच या मुलावर झालेल्या अन्यायाची दखल घेऊन त्याला त्वरित दाखला देण्यात आला.
दरम्यान, या आंदोलनाची दखल घेऊन रुग्णालय अधिष्ठाता यांनी घेतली असून प्रशासनाने संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येणार असल्याचे पत्र संघटनेला दिले. तसेच हर्षलला पुर्ण न्याय मिळवून दिल्याबद्दल रुग्णालयातील डाॅक्टराचे आभार मानले. तर संबंधित डॉक्टर निलंबित होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करु, असे राजेंद्र वाकचौरे यांनी सांगितले.