जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या घरात सोडले खेकडे; राष्ट्रवादी काॅंग्रेस महिला आघाडीचे आंदोलन
पुणे – शिवसेना उपनेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून राष्ट्रवादीने निषेध आंदोलन केलं. पुण्यातील कात्रज भागात तानाजी सावंत यांचे घर आहे. या घरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्यावतीने आंदोलन करण्यात आले.
रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणफुटीला खेकडे जबाबदार होते. खेकड्यांमुळे हे धरण फुटलं असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील घरात खेकडे सोडून आंदोलन केलं. यावेळी तानाजी सावंत यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीने निषेध केला. तसंच शिवाय तानाजी सावंत यांनी राजीनामा देण्याची मागणीही करण्यात आली.
तानाजी सावंत यांचा अजब दावा?
गेल्या 15 वर्षात धरणाला काही झालेलं नाही. धरणात खेकड्यांनी घर केल्यामुळे धरणाला गळती लागली. धरणाचं काम निकृष्ठ नव्हतं, असं तानाजी सावंत यांनी म्हटलं होतं. तिवरे धरणफुटी ही एक नैसर्गिक आपत्ती होती. काही गोष्टी कुणाच्याही हातात नसतात. ही दुर्घटना होती. गावकरी आणि अधिकाऱ्यांशी मी चर्चा केली, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे धरण खेकड्यांनी पोखरलं, त्यामुळेच ते फुटलं असा अजब दावा जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला होता.