breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
जनतेसाठी 26 मे हा विश्वासघात दिवस – सचिन साठे
पिंपरी – भाजप सरकारने जाहीर नाम्यात चार वर्षापुर्वी जनतेला दिलेले आश्वासन पुर्ण केलेले नाही. उलट नोटाबंदी, जीएसटी, एफडीआय असा अन्यायकारक निर्णय लादून सर्वसामान्य नागरिकांना त्रस्त केले आहे. देशातील जनतेने विश्वासाने भाजपाकडे सत्ता सोपविली, परंतू, भाजपने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे 26 मे हा दिवस विश्वासघात दिवस म्हणून पाळला जाईल, असे मत पिंपरी-चिंचवड शहर कॅाग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी माजी महापौर कविचंद भाट, प्रदेश सदस्य संग्राम तावडे, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, प्रदेश मागासवर्गीय सेलचे उपाध्यक्ष गौतम आरकडे, शहर अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, चिंचवड युवा अध्यक्ष मयुर जैयस्वाल आदी उपस्थित होते.
साठे म्हणाले की, ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचा-यांचे संरक्षक बनले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या मुलाला क्लिन चिट देऊन त्यांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले आहे. काँग्रेस सरकारने राफेल विमानाची किंमत प्रति विमान 526 कोटी रूपये ठरवली होती मात्र, मोदींनी तेच विमान 1670 कोटी रूपयांना खरेदी केले. राफेल खरेदीत अनिल अंबानींच्या कंपनींच्या फायद्यासाठी देशाचे 12 हजार कोटींचे नुकसान झाले. हा एक घोटाळा आहे. राज्यातील जनता सर्वात महागडे पेट्रोल व डिझेल खरेदी करीत आहे. देशात भाजपची सत्ता आल्यापासून दलितांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून भारतीय नागरिकांना दिलेले मूलभूत अधिकार काढून घेऊन देशात हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. प्रसार माध्यमांवर सरकारची दहशत, सोशल मिडीयावर लोकांचे आवाज दाबले जात आहेत. विचारांपेक्षा जाहिराती महत्वाच्या ठरत आहेत, व्यक्तिस्वातंत्र्याला समाजद्रोह ठरवलं जात आहे, सरकार विरोधाला राजद्रोह ठरवलं जात आहे, असेही ते म्हणाले.