‘चॅलेंजर पब्लिक स्कूल’मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा, भारताच्या लोकशाहिवर मान्यवरांचे विचारमंथन
- जातीभेद देशासाठी घातक – संदीप काटे
- विद्यार्थ्यांनो देशाचा आदर राखा – भागवत चाटे
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये भारताचा ७१ वा प्रजासत्ताक दिन रविवारी (दि. २६) दिमाखात साजरा करण्यात आला. मराठा लाईट इन्फट्रीचे माजी सैनिक भागवत पांडुरंग चाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलचे संस्थापक व अध्यक्ष संदीप काटे, पालक गायत्री कुलकर्णी, अमित काटे यांनी ध्वजाला मानवंदना दिली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांबरोबरच पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. विद्यार्थ्यांनी वाद्यांच्या तालावर एकसुरात राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांचे शिस्तबद्ध संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. गायन शिक्षिका प्राजक्ता सहजे यांच्या बालचमूने देशभक्तीपर समूहगीत सादर केले. देवयानी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सर्वांना खाऊ वाटप करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या सुषमा उपाध्ये यांनी सर्वांशी संवाद साधला.
भागवत चाटे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी हिम्मत न हारता सातत्याने आध्ययनात प्रयत्न करावेत. चांगले छंद जोपासावेत. विद्यार्थी दशेतच स्वतःला शिस्त लावून घ्यावी. भारत देश सार्वभौमत्व जपणारा देश आहे. या देशातील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचा आदर व मान राखायला हवा. त्यामुळे इतरांपुढे आदर्श स्थापित होईल.
अध्यक्ष संदीप काटे म्हणाले की, ‘भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचा प्रवास हा अत्यंत खडतर होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील संविधान समितीने राज्यघटनेचा मसुदा तयार केला. २६ नोव्हेंबर १९४९ आणि २६ जानेवारी १९५० हे दोन दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय राज्यघटनेचा स्वीकार केला. त्यानंतर दोनच महिन्यांत म्हणजेच २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी केली. त्यानुसार भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र बनले. या घटनांची आठवण म्हणून देशात २६ नोव्हेंबर संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनले. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून भारताची ख्याती आहे. ही ख्याती जपण्याची आज खरच गरज आहे.
शिक्षिका शीतल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन अनं प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अपर्णा सरवते, ज्योती थोरात, सीमा सरदेसाई, रेखा सोनखेडे, समन्वयक रुपाली कुलकर्णी व पलक गांधी यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांनी प्रत्येक बाबींचा बारकाईने अभ्यास करावा
देशात धर्म, जातीभेद अशा घटकांचे महत्व वाढू लागले आहे. हे या सार्वभौम राष्ट्राला घातक आहे. हा देश घडविण्यासाठी अनेकांनी हौतात्म्य पत्करले. देशाला सहजासहजी हे स्वातंत्र्य मिळालेले नाही. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीदशेतच या बाबींचा बारकाईने अभ्यास करून समाजाला लागलेली धर्म, जातीव्यवस्था यासारख्या तकलादू व्यवस्था उखडून फेकण्याचा संकल्प या प्रजासत्ताकदिनी करावा’, असे आवाहन काटे यांनी विद्यार्थ्यांना केले.