चापेकरांचा इतिहास देशभर पोहोचणार – सुमित्रा महाजन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/Damodar-Hari-Chafekar-Post-Tikit-11.jpg)
क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकिटाचे अनावरण
पिंपरी – क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही. तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे. असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी व्यक्त केले.
चिंचवड मधील क्रांतिवीर चापेकर वाड्यात सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते टपाल तिकीट अनावरण सोहळा पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यसभेचे खासदार अमर साबळे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, महाराष्ट्र व गोवा राज्याचे मुख्य पोस्टमास्तर हरिश अगरवाल, चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, कार्यवाह सतीश गोरडे, सह कार्यवाह रवी नामदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे, विलास लांडगे, विनायक थोरात, मुकुंद कुलकर्णी, गजानन चिंचवडे, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, अनुराधा गोरखे, नगरसेवक माऊली थोरात, अॅड. सचिन भोसले, नारायण बहिरवाडे आदी उपस्थित होते.
सुमित्रा महाजन म्हणाल्या, भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी योगदान दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांप्रती आपण कृतज्ञ असायला हवे. आपला इतिहास वेळोवेळी आपल्या स्मृतीत असायला हवा. देशाप्रती आणि देशवीरांप्रती आदराची भावना असायला हवी. राष्ट्रभक्ती आणि कामाची निष्ठा यातून अनेक गोष्टी साकार होतात. सध्या पोस्टल खात्याला मृतावस्था आली आहे. कारण आपण पत्र लिहायला विसरलो आहोत. आपल्या जवळच्या माणसांना बोलायला आपल्याला वेळ नाही आणि शेकडो मैल दूर असणा-या अज्ञात मित्रांना आपण धन्यता मानू लागलो, त्यामुळे ही अवस्था झाली आहे. आपल्या लोकांसोबतच संवाद हरवत चालला आहे. तो पुन्हा पूर्ववत होणे आवश्यक आहे. आपण-आपल्या माणसांना आपल्या मनातल्या गोष्टी लिहिल्या तर मन मोकळे होते. मन मोकळे होणे ही आजच्या काळाची गरज आहे, असेही सुमित्रा महाजन म्हणाल्या.