“गरीब, गरजू लोकांना मदत करणे हेच खरे बाबासाहेबांना अभिवादन !” – बाबासाहेब त्रिभुवन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/19-2.jpg)
– कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरवासीयांना केले आवाहन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
देशातील दीनदलित-दुबळ्या घटकांना न्याय देण्यासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. आज कोरोनामुळे लाखो गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आपणही बाबासाहेबांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या जयंतीचा संपूर्ण निधी या गरीब आणि गरजू नागरिकांची भूक भागविण्यासाठी खर्च करूयात. तसेच यंदाची जयंती घरीच मोठ्या उत्साहात साजरी करू. हेच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिवादन ठरेल, असे आवाहन नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी पिंपरी चिंचवड शहरातील आंबेडकरी अनुयायांना केले आहे.
संपूर्ण राज्यात करोनाने थैमान घातल्याने सर्वधर्मीयांनी गर्दी टाळून सण-उत्सव घरीच साजरे करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन नेते, विचारवंत आणि साहित्यिक पुढे सरसावले असून त्यांनी यंदाची आंबेडकर जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन आंबेडकरी अनुयायांना केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. जयंतीनिमित्त शहरातील लाखो भीमसैनिक पिंपरीतील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी एकत्र जमतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला असून घराबाहेर न पडण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
याविषयी भीमअनुयायांना आवाहन करताना नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन म्हणाले की, बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जमा केलेला निधी ज्यांचे हातावर पोट असून सध्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा कष्टकरी वर्गासाठी द्यावा. त्यांची काळजी करणे ही आपली जबाबदारी आहे. अशा लोकांची चूल विझणार नाही, याची काळजी घ्यावी. या गरजू लोकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात, असं सांगतानाच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी बाहेर गर्दी न करता यंदाची जयंती आपण घरातच मोठ्या उत्साहात साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनांही जयंती घरातून साजरी करण्यासाठी आवाहन करावे, असेही नगरसेवक त्रिभुवन यांनी यावेळी सांगितले.