गणेशोत्सवावर साथीच्या आजारांचे सावट
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह परिसरात आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डेंगी, मलेरिया, थंडी ताप, स्वाइन फ्लू अशा साथीच्या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यासह बदलत्या हवामानामुळे साथीचे आजार वाढल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे आहे. स्वाइन फ्लूने या वर्षी पुन्हा डोके वर काढले आहे. शहरातील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात काही महिनाभरापासून ताप सदृष्य साथीचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवावर साथीच्या आजाराचे सावट पसरले असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असली, तरी आरोग्याबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्योगनगरीची झपाट्याने वाढ होत असून, शहराची लोकसंख्या आता २२ लाखांवर पोहोचली आहे. रोजगार संधी उपलब्ध असल्याने लोकसंख्यावाढीचा वेग अधिक आहे. मात्र, त्या तुलनेत मूलभूत सुविधांच्या बाबतीत महापालिका यंत्रणा कमी पडत आहे.
परिणामी शहराचे पर्यावरण बिघडून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. तसेच पावसाळ्यातील दूषित पाणी, सांडपाणी साचून साथीचे आजार झालेल्या रुग्णांचा आकडाही वाढत आहे. तसेच संसर्गजन्य रोगवाढीचे प्रमाण अधिक आहे. बदलत्या हवामानामुळे आजाराची संख्या वाढली आहे. प्रदूूषित पाण्याद्वारे गॅस्ट्रो, कावीळ, टायफाईड, जठराचा व आतड्याचा दाह, विषमज्वर हे रुग्ण वाढले आहेत. तसेच गेल्या काही वर्षात स्वाइन फ्लूने डोके वर काढले आहे. पावसाळ्यातील डासांमुळे होणारे डेंगी, मलेरिया, चिकुनगुनिया हे साथीचे आजार नियंत्रणात आणल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. तरी साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत.
काळजी घ्या, प्रतिकारक्षमता वाढवा
तापाची साथ आहे, मच्छर चावणार नाहीत यासाठी प्रत्येकाने काळजी घ्यावी. धुणे भांडे झाल्यावर महिलांनी ती जागा स्वच्छ धुवावी. कुंड्या व शोभेच्या वस्तूंमध्ये पाणी साचू देऊ नका. तसेच ताप सर्दी खोकल्याकडे या वेळी दुर्लक्ष नको.
डाॅ. शंकर जाधव वैद्यकीय अधिक्षक वायसीएम रुग्णालय