breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
काॅंग्रेसच्या ‘न्याय’ योजनेचे देशभर स्वागत – सचिन साठे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/download-2.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज) – कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासाद राहुल गांधी यांनी जाहिर केलेली ‘न्याय’ योजना ही देशातील गरीबीवर कायम स्वरुपी मात करणारी ठरणार आहे. हि योजना म्हणजे गरिबी मिटविण्यासाठी अंतिम प्रहार असेल. या योजनेव्दारे दुर्बल घटकांतील कुटूंबांना त्यांचे कौटूंबिक वार्षिक उत्पन्न बाहत्तर हजार रुपये होईल. याचा लाभ महाराष्ट्रातील दोन कोटींहून जास्त जनतेला होणार आहे. या ऐतिहासिक व क्रांतीकारी निर्णयाचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टी स्वागत करीत आहे. असे पत्रक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.
मागील पाच वर्षात केवळ आश्वासने आणि जाहिरातींच्या मागे धावलेल्या भाजप सेना सरकारने देश अधोगतीवर नेला आहे. नापिकी व कर्ज बाजारीपणामुळे शेतक-यांच्या आत्महत्या सुरु आहेत. एका रात्रीत हुकूमशाही पध्दतीने लादलेल्या नोटाबंदी मुळे देशभरातील रोजगार कमी झाले. नोटाबंदी व जीएसटीमुळे खिळखिळी झालेली अर्थव्यवस्था अद्यापही सावरलेली नाही. त्यामुळे मागील पाच वर्षात पिंपरी चिंचवड औद्योगिक पट्यात एकही नविन मोठा उद्योग आला नाही. उलट ॲटो मोबाईल, आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या महाराष्ट्रा बाहेर स्थलांतरीत झाल्या. त्यामुळे शहरातील रोजगार घटून उत्पन्नावर परिणाम झाला आहे. महापालिका, राज्य सरकार व केंद्र सरकारमध्ये भाजपाचेच सरकार असूनही पिंपरी चिंचवड शहरातील रेड झोन, अनधिकृत बांधकाम, शहराला बंद जलवाहिनीव्दारे पाणीपुरवठा, बोपखेल गावासाठी दळणवळण यंत्रणा हे प्रश्न देखील अद्यापपर्यंत भाजपाला सोडविता आले नाहीत. या निवडणूकीत सुज्ञ मतदार राजा भाजप सेनेच्या युतीला नाकारुन कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या पाठीशी उभा राहिल असा विश्वास सचिन साठे यांनी व्यक्त केला.
या देशामध्ये जेवढे ऐतिहासिक क्रांतीकारी बदल होऊन प्रगती झाली ती केवळ कॉंग्रेसच्या दूरदृष्टी व न्याय धोरणांमुळेच झाली. अन्नसुरक्षा, रोजगाराची हमी देणारा मनरेगा, शिक्षणाचा अधिकार, माहितीचा अधिकार, आर्थिक उदारीकरण, बँकांचे राष्ट्रीयीकरण, देशभर संगणकीकरण, माहिती तंत्रज्ञान व वैज्ञानिक प्रगतीकरिता उचलेली पाऊले यामुळे देश प्रगती करु शकला, या प्रत्येक धोरणाच्या अंमलबजावणीवेळी भाजपा व आरएसएसने केवळ विरोधाची भूमिका घेतली. गरिबांच्या कल्याणासाठी खा. राहुल गांधीनी जाहीर केलेल्या या क्रांतीकारी योजनेला संकुचित प्रवृत्तीच्या भाजप नेत्यांनी विरोध सुरु केला आहे. कॉंग्रेस देशहिताचा विचार करुन धोरण आखते व अंमलबजावणी करते, परंतू भाजपचे नेते वैचारिक दिवाळखोरीमुळे असक्षम असल्याने त्यांना केवळ टिका करण्यामध्येच स्वारस्य असते. त्यामुळे भाजपाला गरिबांची चिंता कशी असणार ? असा प्रश्न साठे यांनी उपस्थित केला आहे