औद्योगिक अपघात टाळण्यासाठी विभागानूसार प्रशिक्षण अधिकारी नेमावा
माजी खासदार गजानन बाबर यांची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे मागणी
पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|
राज्यासह जिल्ह्यातील विविध कंपनीला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडू लागले आहेत. त्या घटनेत जीवित हानी अथवा वित्त हानी होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व संभाव्य अपघात टाळण्यासाठी प्रशिक्षण देण्यास प्रशिक्षक अधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी केली.
याबाबत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाकडे पत्र दिले आहे. त्यानी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कारखान्यातील कामगाराची सुरक्षा कल्याण व आरोग्य विभागात महत्वाची मानली जाते. त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारे संभाव्य अपघात आणि संभाव्य आरोग्याचे धोके वाढू लागले आहेत.
महाराष्ट्रात 40 हजार नोंदणीकृत कंपन्या असून या कंपन्यामध्ये 25 लाख कामगार आहेत. सर्वच कंपन्या फॅक्टरी अॅक्ट 1948 आणि 1963 नुसार नियम 73 मध्ये सेफ्टी कमिटी तयार करणे, कलम 41 नूसार सुरक्षा उपक्रमात सहभाग घेणे, सेक्शन 41 बी आणि सुरक्षा धोरण बनविणे, तसेच हवा प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण कायदा 1981, पाणी प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण कायदा 1974, पाणी प्रतिबंध व प्रदुषण नियंत्रण कायदा 2003, पर्यावरण (संरक्षण कायदा)1986, घातक कचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम 1989 प्रमाणे सर्व नियम पाळताना दिसत नाहीत. आपत्कालीन कार्यकारी संघटना व त्यांच्यावर दिलेल्या जबाबदा-या कंपन्यामध्ये आलार्म पध्दत, प्राथमिक वैद्यक वैद्यकीय विभाग, फायर हायड्रंट सिस्ट्रीम , माॅकड्रील व अपघात माहिती पध्दत हे सर्व कंपन्यांमध्ये पाहायला मिळणे आवश्यक आहे.
दरम्यान, 4 ते 11 मार्च हा 49 वा राष्ट्रीय सुरक्षा आठवडा साजरा होत आहे. राष्ट्रीय सुरक्षा दिन म्हणून पाळला जावा. सुरक्षा ही सर्वाची जबाबदारी आहे. सर्व व्यक्तींनी काटेकोर ते पाळले पाहिजेत. प्रत्येक व्यक्तीमागे त्याचे कुटूंब आहे. त्यामुळे सुरक्षेची काळजी घेण्यासाठी प्रत्येक विभागानूसार प्रशिक्षण अधिकारी नेमण्यात यावा, असे म्हटले आहे.