ऐन वारीतच पाण्याची टंचाई, धरणातील पाणी दोनच आठवडे पूरणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/pavana-dam.jpg)
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात केवळ 14 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर वारीच्या नियोजनाचे आव्हान उभे ठाकले आहे. पालखी सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला असताना अद्याप कसल्याच प्रकारचे नियोजन केल्याचे दिसत नाही. पाण्याअभावी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याला गालबोट लागण्याची शक्यता आहे. त्याची खबरदारी पालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
पवना धरणात आजमितीला 14 टक्के पाणीसाठा आहे. एवढे पाणी केवळ दोन आठवडे शहराला पुरू शकते. त्यातच पालखी सोहळ्याचे आव्हान समोर असल्यामुळे वारीतील वारक-यांची पाण्याअभावी गैरसोय होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी पाणी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. परंतु, धरणात पाण्याची कमतरता असल्याने नियोजनातील येणारी उणीव भरून काढायची कशी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 24 आणि 25 जून दरम्यान पिंपरी-चिंचवड शहरात असणार आहे. देहूतून निगडीतील भक्ती-शक्ती चौक, आकुर्डी याठिकाणी पालखी सोहळा येणार आहे. लाखो वारकरी पालखीसोबत शहरात दाखल होणार आहेत. आकुर्डीत पालखीचा एक मुक्काम होऊन दुस-या दिवशी शहरातून पुण्याकडे पालखी मार्गस्त होणार आहे. दरम्यान, पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. त्याचे नियोजन पालिकेने केले आहे. ठिकठिकाणी मोबाईल स्वच्छतागृहांची व्यवस्था केली आहे. मात्र, पाण्याअभावी गैरसोय होण्याची शक्यता आहे.