एकविरा देवस्थानच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा
- डॉ. नीलम गोऱ्हे : ‘बये दार उघड’ मोहिमेची सांगता
कार्ला । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेना परिवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सर्व कुटुंबियांच्या श्रध्दास्थानी असलेल्या श्री. एकविरा देवीच्या दर्शनाने आज मनाला वेगळेच समाधान लाभले. एकविरा देवस्थानचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही लवकरच विधिमंडळात लवकरच एक बैठक घेऊ. या बैठकीसाठी स्थानिक शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांना निमंत्रित करण्यात येईल, असे प्रतिपादन आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी येथे केले.
शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड मोहीम ‘ आज पुणे जिल्ह्यातील एकविरा देवीच्या दर्शनाने समाप्त झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, एकविरा देवीच्या मंदिरातील कळस चोरी झाल्याच्या प्रश्नांवर मी पाठपुरावा केला होता. पुढील वर्षीच्या नवरात्रात देवीच्या मूळ दागिन्यांसह पूजा व्हावी हीच इच्छा आहे. याबाबत मा. उच्च न्यायालयाने आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने योग्य ती कार्यवाही होण्यासाठी लक्ष घालावे, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण स्तरावर या परिसरातील जमिनींचा ताबा घेतल्याचे प्रश्न प्रलंबित आहे. यावर लवकरच बैठक घेणार आहे.
यावेळी शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, युवासेना पदाधिकारी शीतल शेठ, स्त्री आधार केंद्राच्या प्रमुख विश्वस्त जेहलम जोशी, स्थानिक शिवसेना पदाधिकारी मच्छिंद्र खराडे, सुरेश गायकवाड, अनिता गोणते, शैला खंडागळे, वेहेरगावच्या सरपंच अर्चना संदीप देवकर, पुणे महिला आघाडीच्या कल्पना थोरवे, अश्विनी शिंदे, अनिता परदेशी, ज्योती चांदेरे, अमृत पठारे, स्वाती रणपिसे, सुनीता रानवडे, रुपाली सुतार, पिंपरी चिंचवड येथील वैशाली मराठे, अनिता तुतारे, रोशनी जगताप, ज्योती भालके, वंदना वाल्हेकर, कामिनी मिश्रा, सुवर्णा मगर, प्रतीक्षा घुले, डॉ. वैशाली कुलथे, मुळशी तालुक्यातील सुरेखा तोंडे आदी महिला उपस्थित होत्या.
**
खूप मारल्या गप्पा… आणि कुठे गेले आप्पा…
मावळ तालुक्यात अनेकांनी लोकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला असल्याचे नाटक केले. आज मात्र त्यांची अवस्था ‘खूप मारल्या गप्पा आणि कुठे गेले …’ अशी झाली आहे. मावळ वासियांच्या भावनांचा विचार न करता ते आज शिवसेनेची मूळ विचारधारा सोडून गेले आहेत. मात्र, आपण सर्व शिवसैनिक भक्कम असून यामुळे आपल्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी टीका खासदार श्रीरंग बारणे यांचे नाव न घेता डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.