उस्मानाबादेतील नऊ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपींना फाशी द्या – संभाजी ब्रिगेड
पिंपरी / महाईन्यूज
उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात सास्तुर या गावामध्ये नऊ वर्षांच्या चिमुरडीवर चारजणांनी बलात्कार केला. ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील नराधमांना फाशिची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, आज देशभर स्त्री शक्तीचा जागर, आदर करणारा उत्सव म्हणून नवरात्र उत्सव साजरा होत आहे. परंतु, आज ही स्त्रीकडे एक भोगवस्तू म्हणून पाहिले जाते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात सास्तूर गावामध्ये १८ ऑक्टोबर रोजी पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारा निंदनीय प्रकार घडला आहे. एका नऊ वर्षांच्या चिमुरडीवर चार नराधमांनी बलात्कार केल्याचं निदर्शनास आले आहे. या घटनेचा निषेध करावा तेवढा कमीच आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे.
या वर्षाचा आलेख पाहता अशा प्रकारच्या अनेक घटना महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे मुलींना आज घराबाहेर पडणे सुद्धा कठीण झाले आहे. यावर प्रशासन आणि न्यायव्यवस्था कुठं तरी कमी पडताना दिसत आहे. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात कोपर्डी प्रकरण घडले. याचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभर उमटले. याचा परिणाम म्हणून ही केस फार्स्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात आली होती. यावेळी कोर्टाने आरोपींना फाशीची शिक्षा देखील सुनावली आहे. असे असताना देखील या प्रकरणातील आरोपींना अद्याप शिक्षेची सुनिवणी झाली नाही.
सरकार, प्रशासन आणि न्यायपालिका यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने काळे यांनी केली आहे. या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, कार्याध्यक्ष गणेश दहिभाते यांच्या स्वाक्षरी आहेत.





