उद्धव ठाकरेंनी ईडीला घाबरुन औरंगजेबास मुजरा घातला : धनंजय मुंडे
उरण – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तुम्ही ग्रामपंचायतीचे-जिल्हापरिषदचे सदस्य नाहीत, आमदार-खासदार-मंत्री काहीच नाही मग तुमच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून? ईडीला घाबरुन तुम्ही औरंगजेबास मुजरा घातला. अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना केला. ईडीची पिडा टाळण्यासाठीच तुम्ही औरंगजेबास मुजरा केला. इतकंच नाही तर जय गुजरातही म्हणून आले, अशी टीकाही मुंडे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.
मावळ मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ उरण येथील कोप्रोली नाका येथे सभेमध्ये धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी मावळमध्ये जोरदार समाचार घेतला.
हाफ चड्डीची फुल पॅन्ट झाली म्हणजे माणसाला अक्कल येते असे नाही. २३ तारखेला चड्डी उतरवण्याची भाषा करणा-यांनी स्वतःच्या चड्डीत रहायचे. नाहीतर निवडणूकांच्या निकालाआधीच तुमची चड्डी गळून पडल्याशिवाय राहणार नाही असा टोला धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
पवार कुटुंबियांनी जबाबदारी घेतली की त्या भागाचा विकास करणे हे त्यांचे ब्रीदवाक्य असते. शरद पवारांचे नातू व अजित पवारांचे चिरंजीव असलेल्या पार्थमध्येसुद्धा लोकांसाठी झोकून देऊन काम करण्याची धमक आहे. त्यामुळेच उरण भागातून सर्वाधिक लीडने पार्थ पवारांना निवडून द्या असे आवाहन धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. अधर्माच्या विरोधातील लढाई जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनास साद घातली होती. मावळची लढाई जिंकण्यासाठी मोठ्या विश्वासाने पार्थ पवारांना उमेदवारी दिली आहे. पार्थच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय पातळीवरील बंदरालगत असलेल्या शहरांसारखाच उरण शहराचा विकास होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.