‘ई-बस’वर कोटय़वधींचा खर्च
महाईन्यूज | पुणे
विजेवर चालणाऱ्या बहुचर्चित (इलेक्ट्रिकल बस – ई-बस) गाडय़ांची धाव मर्यादित असताना ओलेक्ट्रा कंपनीला पाच महिन्यांत दोन कोटी १६ लाख ७६ हजार २१२ रुपये आणि चार्जिग स्टेशनला वीज पुरविल्याबद्दल महावितरणला ७२ लाख ५६ हजार ४१० रुपये पीएमपीकडून देण्यात आलेले आहेत. ई-बस कडून अपेक्षित अंतर कापले जात नसताना, पाच महिन्यांत एक हजार वेळा फेऱ्या रद्द किंवा बंद कराव्या लागलेल्या असताना तसेच अपेक्षित उत्पन्नही मिळत नसतानाही कोटय़वधी रुपयांचा भरुदड पीएमपीला सहन करावा लागत आहे. तसेच ई-बस पीएमपीसाठी किफायतशीर ठरत नसल्याचेही स्पष्ट झालेलेच आहे.
स्मार्ट सिटी अंतर्गत पर्यावरणपूरक अशा नऊ मीटर आणि बारा मीटर लांबीच्या विजेवर धावणाऱ्या गाडय़ा पीएमपीच्या ताफ्यात दाखल झालेल्या आहेत. या गाडय़ांना प्रत्येक किलोमीटरसाठी ४१ रुपये पीएमपी संबंधित कंपनीला देणार आहे. या पाश्र्वभूमीवर गाडय़ा बंद पडण्याचा तपशील, गाडय़ांनी कापलेले अंतर, विजेवर झालेला खर्च, गाडय़ांपोटी कंपनीला दिलेली रक्कम याचा तपशील डॉ. सुमेध अनाथपिंडिका आणि तुषार उदागे यांनी माहिती अधिकारात मागविला होता. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.
तीन ते चार तासांच्या चार्जिगसाठी पीएमपीला प्रति युनिट आठ रुपये खर्च येत आहे. हा खर्च करून एक गाडी एका चार्जिगनंतर २२५ किलोमीटर धावेल, असे सांगण्यात येत होते. त्यासाठी कंपनीला प्रत्येक किलोमीटरसाठी ४१ रुपये या प्रमाणे रक्कम मोजण्यात येत आहे. माहिती अधिकारात यापूर्वी मिळालेल्या तपशिलानुसार ई-बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर एक गाडी दीडशे किलोमीटर अंतर रोज धावत असल्याचे निगडी आणि हडपसर आगाराने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले होते. तर तांत्रिक कारणांमुळे अनेकदा फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. ई-बसला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असला, तरी अपेक्षित उत्पन्न पीएमपीला मिळत नसल्याचे चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर या गाडय़ा पीएमपीसाठी किफातशीर ठरत नसल्याचे दिसून येत आहे.