आदित्य ठाकरेंनी सत्तेत आल्यावर जन आशिर्वाद यात्रा काढायला हवी होती – खासदार अमोल कोल्हे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/07/amol-kolhe.jpeg)
- माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सायकल स्पर्धेचे उद्घाटन
बारामती – शिवसेनेचे युवा प्रमुख आदित्य ठाकरेंनी विधानसभेपूर्वी यात्रा काढण्याऐवजी सत्तेत आल्यावर काढायला हवी होती. त्या निमित्ताने काम काय करावे, हे समजलं असतं. तसेच मधल्या काळात यात्रा काढली असती तर कामाचे मुल्यांकन करता आले असते, अशा शब्दांत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आदित्य ठाकरे यांनी काढलेल्या जन आशीर्वाद यात्रेवर चांगलाच हल्लाबोल केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा पार पडली. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
काॅंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2014 मध्ये कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र, असे विचारणाऱ्यांना आरशात उभे राहिल्यावर स्वतःलाच आपण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असे विचारण्याची वेळ आली आहे. भाजप सरकारकडून जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याऐवजी पवारसाहेब, अजितदादांच्या नेतृत्त्वावर विश्वास असल्यामुळे कोणीही पक्षांतर करणार नसल्याचा विश्वासही डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.