अमोल कोल्हेंविरोधात टीका करताना भान बाळगा : खासदार आढळराव पाटील
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/AMOL-KOLHE-1-696x364.jpg)
पुणे – शिरुर लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना सोशल मीडियावर एकमेकांविरोधात टिका टिपण्णी होवू लागली आहे. यामुळे शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन केले आहे. त्यांनी आपल्या समर्थकांना आपल्या विरोधी उमेदवारावर टीका करताना भान बाळगण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक आयोगाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीनिमित्त सोशल मीडियाच्या वापराबाबत काही दिशानिर्देश दिले आहेत. असे असले तरीही राजकीय कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर पातळी सोडून टीका होत आहे.
आढळराव म्हणाले, ‘निवडणुका देशाचे भविष्य ठरवणाऱ्या आहेत. निवडणुका येतात-जातात मात्र सध्या आपणा सर्वांनाच आपले व्यक्तीगत मत मांडता यावे यासाठी म्हणून सोशल मीडियासारखे माध्यम उपलब्ध होणे हे आपले भाग्य आहे. त्याचा लाभ जरूर घ्या, पण कुणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी आणि कमी वा सत्यता न पडताळलेली माहिती व्हायरल करु नका.’
हे सांगताना आढळराव यांनी आपल्या समर्थकांना विरोधकांच्याबाबतही हा नियम पाळण्यास सांगितले. ते म्हणाले, ‘माझ्या विरोधात उभे राहिलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सुद्धा मला माननाऱ्या मतदारांनी ही दक्षता पाळावी. कारण भावनेच्या भरात आपण लिहिलेल्या कोणत्याही पोस्टने कुणाच्याही भावना दुखावल्या जाऊ शकतात, याचे सतत भान असु द्या. आपल्या मतामुळे कुणातही कटुता निर्माण होऊ नये अशी दक्षता घ्या आणि जगातील सुंदर भारतीय संस्कृती जपा.’