अतिक्रमणांवर प्राधिकरणाची करडी नजर, पाच भरारी पथकांची नेमणूक
- तपासणी, कारवाई तीव्र होणार
- अतिक्रमणाला आळा बसणार
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अनेख भुखंडांवर अतिक्रमणे करून उद्योग, व्यावसाय केले जात आहेत. सातत्याने अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या तक्रारी येतात. त्यासाठी अतिक्रमणे व अवैध बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी नवनगर प्राधिकरणाने भरारी पथके नेमली आहेत. अधिकारी, पोलिसांचा समावेश असलेल्या या पथकांकडून पाहणी व तपासणी करून कारवाई तीव्र केली जाणार आहे.
- नवनगर विकास प्राधिकरणाचे मोशी, चिखली, निगडी, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, चिंचवड या ठिकाणी प्रामुख्याने मोठ मोठे भुखंड आहेत. या भुखंडाच्या एकूण 42 पेठा प्राधिकरणाने नियोजनासाठी केलेल्या आहेत. या 1 ते 42 पेठांमध्ये काही ठिकाणी नागरिकांकडून अतिक्रमण केले जात आहे. मोठ मोठी गोदामे, अवैध धंदे आणि लहान उद्योग-व्यावसाय सुरू आहेत. काही ठिकाणी पेठांमध्ये आवश्यक परवाने न घेताच बांधकामे केली जात आहेत. परवानगीविना वाढीव बांधकामे केली जातात.
याकडे प्राधिकरणाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. मात्र, नवनियुक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा कुंभार यांनी या अतिक्रमणांकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी भरारी पथके नेमून अतिक्रमणांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्जता ठेवली आहे. प्राधिकरणाने 1 जूनपासून पाच भरारी पथके अशी बांधकामे शोधून काढून कार्यवाही करणार आहेत. एका पथकात एक कनिष्ठ अभियंता, दोन कर्मचारी आणि दोन पोलिसांचा समावेश आहे.
- पथकाकडून दरमहा आढावा घेणार
- या पाच पथकांना 42 पेठा ठरवून दिल्या आहेत. तेथील अतिक्रमणे व बांधकामांची पाहणी, तपासणी सातत्याने करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तसेच, तक्रारीनुसार तपासणीही त्यांना करावी लागणार आहे. या पथकावर तहसलिदार तथा अतिक्रमण निर्मूलन अधिकारी वर्षा पवार यांचे नियंत्रण राहील. तसेच, या पथकांचा दरमहा मुख्य कार्यकारी अधिका-यांकडून आढावा घेतला जाणार आहे.