अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा जोपासण्याची गरज- एकनाथ पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/DSC_9206.jpg)
पिंपरी – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा व विचारांचा वारसा जोपासण्याची गरज असल्याचे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधनपर्वाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात १ ते ५ ऑगस्ट दरम्यान प्रबोधनपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उदघाटन बुधवार (दि. १) सायंकाळी झाले. यावेळी विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, मनसे गटनेते सचिन चिखले, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्या सुमन पंवळे, शर्मिला बाबर, माधवी राजापुरे, प्रियंका बारसे, स्विकृत सदस्य अॅड. मोरेश्वर शेडगे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, मनोज लोणकर, सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब आडागळे, अमित गोरखे, प्रा. धनंजय भिसे आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले की, नागरिकांमध्ये समाज प्रबोधन व्हावे व महापुरूषांचे विचार समाजासमोर जावेत, यासाठी महापालिका अशा उपक्रमांचे आयोजन करित आहे. त्या माध्यमातून चर्चासत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
दत्ता साने म्हणाले की, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची शाळा शिकून आपल्या प्रतिभेच्या जोरावर साहित्य निर्मिती केली व समाजासमोर एक आदर्श घालून दिला.
मनसे गटनेते सचिन चिखले, मनोज तोरडमल, भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, अमित गोरखे यांनीही साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक अरूण जोगदंड यांनी केले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. तर, आभार सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी मानले.