#Nisarga Cyclone:रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू
रायगड : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर 3 जूनला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. त्यामुळे येत्या 48 तासात ‘निसर्ग’ चक्रीवादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर 3 जूनला घरातच राहून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे.
या वादळाला तोंड देण्यासाठी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयार आहे. तसेच मच्छिमारांनाही समुद्रास जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.