‘काँग्रेसने फक्त एकाच परिवाराला भारतरत्न दिले’; पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसने फक्त एकाच परिवाराला भारतरत्न दिले, अशी खोचक टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेसने दहा वर्षात अर्थव्यवस्थेची प्रगती किती केली? १२ क्रमांकावरुन ११ व्या क्रमांकावर. आम्ही पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणली आहे. हे काँग्रेसवाले आम्हाला अर्थव्यवस्थेवर शिकवत आहेत. काँग्रेसने ओबीसींना आरक्षणही नीट दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न देण्यास योग्य नाहीत असं ज्यांना वाटत होतं आणि ज्यांनी आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिले असे लोक आम्हाला उपदेश देत आहे. सामाजिक न्याय या विषयावर आम्हाला ते शिकवत आहेत. ज्या काँग्रेसच्या नेत्याची गॅरंटी नाही, नीतीची काही गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्न कसे काय उपस्थित करत आहेत? असा सवाल उपस्थित केला.
हेही वाचा – राजकीय पक्ष स्थापन करणार का? मनोज जरांगे पाटील म्हणाले..
एक तक्रार अशी होती की देश आणि जग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाकडे असं का पाहतो? देशाला यांचा इतका राग का आला? ही यांच्याच कर्माची फळं आहेत. जे काही करणार त्याची फळं इथेच भोगायची आहेत. आम्ही लोकांना सांगितलं नाही तुम्ही यांच्याविषयी असं बोला. लोकच यांच्याविषयी बोलत आहेत. मी एक म्हणणं वाचून दाखवतो. ‘सदस्यांना माहीत आहे की आपली ग्रोथ कमी झाली आहे. महागाईचा दर वाढतो आहे. करंट अकाऊंट डेफिसिट आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच गेलाय.’ हे म्हणणं माझं नाही मनमोहन सिंग यांचं हे म्हणणं आहे.
देशाची अवस्था काय हे त्यांनी सांगितलं होतं. मी आता दुसरं म्हणणं वाचून दाखवतो. ‘देशात खूप राग आहे, सरकारी संस्थांचा गैरवापर होतो आहे.’ असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आता मी तिसरं म्हणणं मांडतो, ‘टॅक्स कलेक्शनमध्ये भ्रष्टाचार होतो, त्यामुळे जीएसटी आणला पाहिजे. गरीबातला गरीब हा आणखी गरीब होतोय त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे. सरकारी कंत्राटं जशी दिली जात आहेत त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत ही पद्धतही बदलली पाहिजे.’ हे देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. त्यांच्या आधी एक पंतप्रधान म्हणाले होते की दिल्लीतून मी १ रुपया पाठवतो पण पोहचतात १५ पैसे. आजार काय हे माहीत होतं. पण त्यावर सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.