..तर संभाजी भिडे यांना फाशी देणार का? नाना पटोलेंचा फडणवीसांना सवाल
मुंबई : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी एक वादग्रस्त विधान केलं आहे. भिडे यांच्या त्या विधानानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. भिडे यांच्या निषेधार्थ विरोधी पक्षातील नेत्यांकडून ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, महापुरूषांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांच्या केवळ मुसक्या बांधू नये, तर रस्त्यावर फाशी द्यावी. आता आमचा सवाल आहे की, संभीजी भिडे यांना देवेंद्र फडणवीस फाशी देणार का?, असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
हेही वाचा – कुणाल आयकॉन रोडवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात
आम्ही आंदोलन केलं तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत. मात्र, ज्याला देशातून तडीपार केलं पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे. हे कोणतं राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले ?
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.