‘संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये’; नाना पटोलेंची संजय राऊतांवर जहरी टीका
संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरदे यांचा उल्लेख करून काँग्रेसमध्ये निर्णय राहुल गांधी किंवा गांधी कुटुंब घेत असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
नाना पटोले म्हणाले की, संजय राऊतांनी चाटूगिरी करू नये. ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. गांधी परिवारावर हे लांच्छन लावणं सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. गांधी परिवार त्यागाचा परिवार आहे. पंतप्रधानपद त्या कुटुंबाने सोडलं आहे. राहुल गांधींनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडलं आहे. मल्लिकार्जून खरगे हे आमचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा मोठा अनुभव आहे. ते अनेक वर्षे आमदार-खासदार होते.
संघटनेत मल्लिकार्जून खरगे ब्लॉक अध्यक्षपासून काम करत आले आहेत. त्यांना संघटनेचा मोठा अनुभव आहे. मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्षमतेवर आक्षेप घेणं आणि गांधी परिवारावर चुकीचा आरोप करणं म्हणजे चोमडेपणा आहे. संजय राऊतांनी हा चोमडेपणा थांबवावा. हे चुकीचं आहे. ते अशाप्रकारे दुसऱ्यांचे प्रवक्ते होतात, असं नाना पटोले म्हणाले.
परवा अजित पवारांनीही संजय राऊतांना त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते होऊ नका सांगितलं. त्यांनी आमच्याही पक्षाच फार चोमडेपणा करू नये, असाच आमचा सल्ला आहे, असा टोलाही पटोलेंनी संजय राऊतांना लगावला आहे.