राज्यात संपूर्ण अनलॉक कधी होणार? टास्क फोर्सचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई | मुंबईसह राज्यभरात डिसेंबरअखेर सुरू झालेली कोरोनाची तिसरी लाट आता पूर्ण आटोक्यात आली आहे. मात्र अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळत असल्यामुळे पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोना नियंत्रणाची ही स्थिती कायम राहिल्यास मार्चअखेरनंतरच 100 टक्के ‘अनलॉक’चा निर्णय घेता येईल, अशी माहिती राज्याच्या ‘टास्क फोर्स’चे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी दिली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक वेगाने पसरणाऱ्या ओमायक्रोनमुळे मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्या 20 हजारांपार नोंद होऊ लागल्याने पालिकेसह राज्य सरकारचेही टेन्शन वाढले होते. मात्र दोन लाटांपेक्षा तिसऱ्या लाटेतील कोरोना व्हेरिएंटच्या कमी घातकतेमुळे महिनाभरातच कोरोना नियंत्रणात आला. त्यामुळे 1 फेब्रुवारीपासून सर्व राष्ट्रीय उद्याने, पर्यटन स्थळे,चौपाट्या, उद्याने-मैदाने पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली. मात्र अजूनही दररोज शेकडो रुग्ण आढळत असल्यामुळे मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्वीमिंग पूल, रेस्टॉरंट, हॉटेल, चित्रपटगृहे, नाटय़गृहे, नियमित वेळेनुसार मात्र 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली.
दरम्यान, मुंबईत दररोज 30 ते 40 हजार चाचण्या होत असताना 200 ते 250 कोरोनाबाधित आढळत आहेत. त्यामुळे मुंबई 100 टक्के अनलॉक होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र घाई न करता अजून काही दिवस खबरदारी घेतली पाहिजे आणि कोरोना असाच नियंत्रणात राहिला तर 100 टक्के अनलॉक करता येईल अशी भूमिका राज्याच्या ‘कोरोना टास्क फोर्स’ ने घेतली आहे.