सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं’; गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया
मुंबई – परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. त्यानंतर या प्रकरणात आता सक्तवसुली संचालनालय म्हणजेच ईडी देखील उतरली असून अनिल देशमुखांविरोधात ईडीने ईसीआयआर दाखल केला आहे. त्यानंतर अनिल देशमुख यांनी चुप्पी साधली होती. आता त्यांनी या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे.
मी न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला देण्याचं काम राजकीय हेतुपोटी सुरू आहे. मी गृहमंत्री असताना मधल्याकाळात काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळं केंद्र सरकार नाराज असू शकतं आणि त्यातूनच माझ्यामागे सीबीआय आणि ईडी लागली असू शकते, अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली आहे.
“सत्य परेशान हो सकता है पराजित नहीं”, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर आपण काहीही चुकीचं केलेलं नाही. माझ्यावर राजकीय हेतुपोटी शिक्षा द्यायचं काम होत आहे, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं आहे. सर्व चौकश्यांना सामोरं जाणार असल्याचे संकेत अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी हे केंद्र सरकारचं राजकीय छळ असल्याचं म्हटलं होतं. जर पैसे दिले असे ईडी आणि सीबीआयचं म्हणणं असेल तर परमबीर सिंह व वाझेवर कारवाई का नाही?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला होता.