नऊ महिन्यात ६२ जणांचे प्राण वाचवण्यात यश ; मध्य रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी
मुंबई : रेल्वे मालमत्तेची सुरक्षा करणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रवाशांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष दिले जाते. मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी गेल्या नऊ महिन्यात जीव धोक्यात घालून ६२ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.मिशन जीवन रक्षक” चा एक भाग म्हणून मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलातील जवानांनी जानेवारी ते सप्टेंबर २०२२ पर्यंत मध्य रेल्वे मार्गावर आतापर्यंत ६२ नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. या घटनांपैकी फक्त मुंबई विभागात २४ प्रवाशांचे जीव वाचवण्यात आले.
नागपूर विभागात १४ , पुणे विभागात १२, भुसावळ विभागात आठ आणि सोलापूर विभागात चार घटनांची नोंद झाली आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, हिंसाचार, रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीत अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका आणि रेल्वे तसेच रेल्वे परिसरात अंमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवून देणे इत्यादी विविध प्रश्न सोडवावे लागतात. हे काम करतानाच आरपीएफच्या सतर्कतेमुळे धावत्या गाडीत चढ- उतार करणाऱ्या, वेळप्रसंगी आत्महत्या करण्यास आलेल्या नागरिकांचा जीव वाचला आहे.