कापूस, धान खरेदी केंद्र सुरू करा; नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई: राज्यातील शेतकरी मोठय़ा अडचणींचा सामना करत असून परतीच्या पावसाने राज्यातील बहुतांश खरिपाची पिके पाण्यात वाहून गेली आहेत. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, मका ही पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. त्यात काही जिल्ह्यांमध्ये कापूस आणि भाताचे पीक काही प्रमाणात शेतकऱ्यांनी मोठय़ा कष्टाने वाचवले आहे; पण सरकारी खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून लूट सुरू आहे. त्यामुळे सरकारने पुरेशी कापूस आणि धान खरेदी केंद्रे सुरू करावीत आणि शेतकऱ्यांची लूट थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
एकीकडे अस्मानी संकटापासून पीक वाचवणाऱ्या शेतकऱ्याला सरकारी अनास्थेलाही तोंड द्यावे लागत आहे. निसर्गाच्या माऱ्यात जपलेले पीक आता पूर्ण नाही, पण काही प्रमाणात हाती आले आहे. पण सरकारने अद्याप पुरेशा प्रमाणात कापूस आणि धान खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांनाच त्यांचा शेतमाल विकावा लागतो आहे. त्यातच धान खरेदीसाठी घातलेल्या ऑनलाइन नोंदणीच्या अटीमुळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.
दुर्गम आदिवासी भागातील अनेक शेतकरी ऑनलाइन नोंदणी करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या मालाची अद्याप खरेदी झाली नाही. यामुळे सरकारने या ऑनलाइन नोंदणीची अट रद्द करून तत्काळ पुरेशी केंद्रे सुरू करावीत. शेतकऱ्यांचा कापूस आणि धान खरेदी करून अडचणींतील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.