पुनर्विकासाचे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार; जितेंद्र आव्हाडांची मोठी घोषणा
मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएचे प्रकल्प रखडवणाऱ्या बिल्डरांना मोठा दणका दिला आहे. आशय पत्र आणि बँकांकडून कर्ज घेऊनही बिल्डरांनी एसआरएचे प्रकल्प पूर्ण केले नाहीत. हे प्रकल्प एसआरए ताब्यात घेणार असून एसआरए स्वत: लोकांना घरे बांधून देणार आहे, अशी घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यामुळे एसआरएतील घरांची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
एसआरएमध्ये आशयपत्र घेतले म्हणजे तुम्ही जमिनीचे मालक होत नाही. अनेक बँकांनी, संस्थांनी आशयपत्र बघून बिल्डरांना कर्ज दिलेले आहे. खरं तर या बँकांनी पुन्हा एसआरएकडे यायला हवे होते. बिल्डरांनी पैसे घेतले एसआरएसाठी आणि ते भलतीकडेच लावले. त्यामुळे असे जे प्रकल्प रखडले आहेत ते एसआरए ताब्यात घेईल. एसआरएच हे प्रकल्प पूर्ण करून लोकांना घरेही दिली जातील, असे आव्हाड म्हणाले. हजारो लोक आज रस्त्यावर आहेत. त्यांना भाडेही मिळत नाही. त्यामुळे हे प्रकल्प म्हाडा ताब्यात घेईल. यापुढे किती दिवसात काम करायचे याची कायद्यात तरतूद केली जाईल. जवळजवळ ५० हजार कोटी रुपये बिल्डरांनी गुंतवले आहेत. तरीही हे प्रकल्प तयार झालेले नाहीत. बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली आहेत, असे सांगतानाच ज्या एसआरए प्रकल्पात मूळ रहिवाशांची घरे न बांधता विक्री करण्यासाठी आधी इमारती बांधल्या असतील अशा ठिकाणी अधिकार्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.