दादरमध्ये राज्यपालांच्या कार्यक्रमातच वीज पुरवठा खंडित
मुंबई | मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबवली आणि अन्य शहरांमध्ये आज सकाळी वीज पुरवठा अचानक खंडित झाला. यामुळे सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झालेली असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमालाही याचा फटका बसला. दादर येथे राज्यपालांच्या उपस्थितीत राज्य पुरस्कार स्काऊटगाईड प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्याआधीच वीज पुरवठा खंडित झाल्याने काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.
तांत्रिक कारणामुळे मुंबईतील दादर, वांद्रे, माहीम आणि सांताक्रुझ परिसरातील वीज पुरवठा आज खंडित झाला होता. नंतर हा वीज पुरवठा सुरळीत झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईजवळील शहरांमध्येही वीज पुरवठा खंडित
पडघा येथील महापारेषणच्या ४०० KV उपकेंद्रात बिघाड (बस ट्रिप) झाल्यामुळे पडघा ते पाल २२० KV उच्चदाब वाहिनीवर वीजपुरवठा असणाऱ्या महावितरणच्या डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर येथील ग्राहकांचाही वीज पुरवठा काही काळासाठी खंडित झाला.