तारापुरात वायु गळती झाल्याची शक्यता; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
पालघर – बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील कोलावडे गावात अचानक धूर सदृश्य वायू गळती झाल्याची शक्यता आहे. वायू गळती झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. नागरिकांना चक्कर येणे, मळमळणे, डोळे चरचरणे येणे असे प्रकार सुरू झालेत. त्यामुळे काही नागरिकांना रुग्णालयात पाठविल्याची माहिती दिली आहे.
रविवारी रात्री औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कोलवडे गावात वायूचा प्रचंड त्रास नागरिकांना होऊ लागला. रात्री 10 च्या सुमारास औद्योगिक क्षेत्रा लगत असलेल्या कोलवडे गावात मोठ्या प्रमाणात संमिश्र विषारी वायूचा धूर हवेत पसरला. काही वेळात नागरिकांना डोळे चुरचुरणे, घसा खवखवणे व चक्कर येण्याच्या घटना घडू लागण्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते मनीष सुंखे यांनी दिली आहे. या वायू गळतीमुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. गावकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडलाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्व अधिकाऱ्याचे फोन बंद असल्याचं आढळून आलं होतं.
दिवसेंदिवस तारापूर धोकादायक बनत चालले असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येते. परिणामी मोठ्या गंभीर अपघाताला नागरीकांनाच सामोरे जावे लागणार यात काही शंका नाही. यामुळे मानवी जीवनास धोका निर्माण करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तर पालघरचे उपविभागीय अधिकारी तोरष्कर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिसांना या भागाची पाहणी करून माहिती घेण्यास सांगितले असल्याची माहिती दिली.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात वायुप्रदूषण झाल्याने घाबरलेल्या नागरीकांनी रस्त्यावर येत बोईसर पोलिसांना संपर्क केल्यानंतर कोलवडे गावात पोलीस दाखल आहेत. हवे पेक्षा जड असलेल्या या वायु मिश्रित धुरामुळे श्वास घेण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आलं आहे.