नवाबभाईंना नोटीस म्हणजे आम्हाला नोटीस – सुप्रिया सुळे
![Notice to Nawabbhai means notice to us - Supriya Sule](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/images_1578486313098_Supriya_Sule.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने छापे मारल्यानंतर त्यांना कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. मलिकांना सकाळीच कार्यालयात नेल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी मत मांडलं आहे.
नवाबभाईंना नोटीस दिली असेल, तर ती आम्हाला नोटीस असल्याचं आम्ही समजू, असं सुळे म्हणाल्या. याआधी शरद पवार यांना ईडीने समन्स पाठवणार असल्याची बातमी समोर येताच ईडी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले होते. यानंतर आता पुन्हा वातावरण तापण्याची शक्यता आहे.
कोणतीही नोटीस न पाठवता अधिकारी घरी आल्याचं समजतं. ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करण्याची नवाब मलिक यांची तयारी आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते ईडीच्या रडारवर आहेत, असं सुळे म्हणाल्या. तुम्ही भाजपसोबत गेलात नोटीस मागे पडते. पण विरोधात बोललात, देशाच्या प्रश्नासाठी लढलात तर नोटीस येते, असा आरोप त्यांनी केला आहे.
तुम्ही गप्प बसलात तर ईडीच्या नोटिसा विरघळून जातात. केंद्राच्या बाजूने लढलं, तडजोड केली की लगेच नोटीस मागे जाते. राज्यातील कॅबिनेट मंत्र्याला थेट चौकशीसाठी नेलं जातं. यावर आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी आहे. दडपशाही किंवा आवाज दाबण्याचं काम होतंय. यातले फॅक्ट पहा, नवाब मलिक ताकदीने लढतील, आम्हीही त्यांच्यासोबत राहू. नवाब मलिक यांना नोटीस म्हणजे आम्हालाच नोटीस, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपच्या कोणत्या व्यक्तीला ईडीची नोटीस आली? आमच्याकडे असताना ईडीची नोटीस, भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्या ईडी चौकशीचं काय झालं? फक्त आपल्याच नव्हे तर इतर राज्यातही तपासून बघा, असं त्यांनी म्हटलंय. न्यायालयाच्या काही केसेस आहेत. माझ्या वडिलांनी ५५ वर्षे राजकारणात घालवली आहेत. त्यांच्यावर लाखो आरोप झाले पण त्यांनी कधीच पलटवार केला नाही, सूडाची भावना नाही. आम्हालाही अनेकदा नोटीस आल्या. आम्ही लढलो नाही पण सत्य न्यायालयासमोर ठेवलं आणि आम्हाला न्याय मिळाला, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.