नवाब मलिकांच्या राजीनाम्याची गरज नाही – राष्ट्रवादी काँग्रेस
मुंबई | प्रतिनिधी
छोट्या आरोपांवर तसेच खोटो आरोप केल्यानंतर अटक झाल्यानंतर राजीमान्याची गरज नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिक यांच्या अटकेवर मांडली आहे. यामुळं मलिक यांच्याकडून राजीनामा घेतला जाणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये जी चर्चा सध्या सुरु आहे की ज्या आरोपांमध्ये नवाब मलिकांना अटक दाखवण्यात आली आहे. ते आरोपच मुळात खोटे आहेत. अनेक वर्षांपूर्वी जी जमिन खरेदी करण्यात आली, त्याचा या प्रकरणाशी संबंध नाही. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं त्यांचा दाऊद गँगशी संबंध जोडण्यात येतो आहे. या आरोपांमध्येही तथ्य नाही. त्यामुळं जर खोटे आरोपांवर जर अटक होत असेल तर अशा पद्धतीनं आपल्या मंत्र्यांचे राजीनामे आपण घेणार का? उटसूठ कोणीही आरोप केले तर आपण राजीनामे घ्यायचे का? अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसनं मांडली आहे.
याबाबत राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांमध्ये चर्चाही होणार आहे. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील निवासस्थानी सध्या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक सुरु आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ हे देखील हजेरी लावणार आहेत. जयंत पाटील यांनी देखील आपला दौरा अर्धवट सोडला असून ते मुंबईत परतत आहेत. हे मंत्री आणि नेते नंतर मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करणार आहेत. त्यानंतरच नवाब मलिकांबाबत अंतिम निर्णय होईल.