कोकण किनारपट्टीला ‘उष्णतेची लाट’ चा धोका नाही!
मुंबई | राज्यभरात उष्णतेची लाट उसळलेली असताना पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही तालुक्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने हे वातावरणीय बदल झाले आहेत. अशातच कोकणाला ‘असनी’ चक्रीवादळाचा धोका असल्याचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. येत्या दोन-चार दिवसांत कोकणाला चक्रीवादळाचा धोका आहे, अशी चर्चा सर्वत्र होती. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही, असे म्हणत कोकणाला चक्रीवादळाचा धोका नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घाबरून जाऊ नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, मागच्या काही दिवसात राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांच्या पिकांना बसला. कांदा, द्राक्ष, हरभरा, गहू, मका अशा पिकांचे नुकसान झाले. त्यातच असनी चक्रीवादळ कोकण समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत मच्छिमारांनादेखील खबदारी बाळगण्याचे मेसेज व्हायरल झाले होते. मात्र, कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच सध्या कोकणातील वातावरण ढगाळ असले तरी समुद्र शांत आहे.
दरम्यान, यापूर्वी निसर्ग आणि तौक्ते या चक्रीवादळांमुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले होते. अनेकांची घरे, आंबा-काजूच्या बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या. त्यामुळेच पुन्हा चक्रीवादळ येणार, या शक्यतेने नागरिक घाबरले होते. परंतु आता प्रशासनाच्या स्पष्टीकरणानंतर नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.