तिबेटविषयी नेहरूंना दोष देता येणार नाही; निर्वासित सरकारच्या अध्यक्षांनी मांडली भूमिका
![Nehru cannot be blamed for Tibet; The role played by the President of the Exiled Government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Nehru-cannot-be-b.jpg)
मुंबई | ‘तिबेटवरील चीनच्या ताब्याला मान्यता देत, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी घोडचूक केल्याचे अनेक जण मानतात. मात्र, त्यांनी त्यांच्या देशाच्या दृष्टीने योग्य अशीच भूमिका घेतली,’ असे प्रतिपादन तिबेटच्या निर्वासित सरकारचे अध्यक्ष पेन्पा त्सेरिंग यांनी म्हटले आहे.
त्सेरिंग यांनी अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि अमेरिकी काँग्रेसमधील सदस्यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिपादन केले; तसेच भारताच्या भूमिकेमध्ये २०१४नंतर बदल झाल्याचे सांगून त्यांनी आभार मानले.
नेहरू यांच्या भूमिकेवर विचारले असता, ते म्हणाले, ‘या निर्णयासाठी मी नेहरू यांना दोष देत नाही. कोणत्याही नेत्याला निर्णय घेत असताना, राष्ट्रीय हितसंबंधांचा सर्वांत आधी विचार करायचा असतो. त्या वेळी भारतासाठी काय योग्य आहे, असा विचार करूनच नेहरू यांनी तो निर्णय घेतला असावा. केवळ भारतानेच नव्हे, अनेक देशांनी चीनच्या तिबेटवरील ताब्याला मान्यता दिली होती. नेहरू यांनी चीनवर अवाजवी विश्वास टाकला आणि त्यातूनच, १९६२मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले. याच धक्क्यातून नेहरू यांचे निधन झाल्याचे अनेक जण मानतात.’