भीमा कोरेगाव हिंचाराच प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना समन्स
![Displacement of Kashmiri Pandits when BJP was in power - Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-10-at-12.18.07-PM-1.jpeg)
मुंबई । प्रतिनिधी
कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आले आहे. संबंधित घटनेची चौकशी करणाऱ्या कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील सुनावणीत हजर राहण्यास सांगितले आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय चौकशी आयोगाची मुंबई व पुण्यात होत आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात ही सुनावणी पार पडेल.
आयोगाकडून आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनाही पाचारण करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी केवळ प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी त्यांना बोलावण्यात येणार आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. तरीही चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यापूर्वीही मुंबईतील सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते या चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आले आहे.
विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्याचा अर्ज आयोगाकडे केला होता. त्यानुसार आयोगाने शरद पवार यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधाने केली होती. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे या घटनेसंदर्भात जास्त माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात यावी, असे सागर शिंदे यांनी म्हटले होते.