लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद!
मुंबई – उतर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांनी आज राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे आज मेडिकल स्टोअर्स, दूध पुरवठा, रुग्णालये इत्यादी अत्यावश्यक सेवा वगळता इतर बाजारपेठा बंद राहणार आहेत.
११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन महाविकास आघाडीकडून करण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लखीमपूर हिंसाचारावर चर्चा करण्यात आली. त्या घटनेत निधन झालेल्या व्यक्तींना मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर ११ ऑक्टोबर रोजी अत्यावश्यक सेवा, जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व सेवा दिवसभर बंद राहिल अशी माहिती मंत्री जयंत पाटील यांनी दिली होती. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले होते, तर शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. तसेच शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजपा दिसून आली, असे बाळासाहेब थोरात म्हणाले होते.
दरम्यान, प्रदेश काँग्रेसच्या वतीने आज, राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करण्यात येणार आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विविध नेते त्यात सहभागी होतील. तसेच बंद यशस्वी होऊ नये म्हणून भाजपानेही विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपाच्या विविध संघटना व कामगार संघटनांनी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.