‘जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय’, सचिन वाझे यांच्या व्हॉट्स अॅप स्टेटसने खळबळ
![Sachin Waze's bail application rejected by NIA court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Sachin-Vaze.jpg)
मुंबई – मनसुख हिरेन प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं नाव घेतलं जातंय. त्यामुळे गुन्हे शाखेतून त्यांची उचलबांगडी थेट विशेष शाखेत करण्यात आलीय. मात्र, सचिन वाझे पुन्हा एकदा त्यांच्या वॉट्स अॅप स्टेटसमुळे चर्चेत आलेत. वाझे यांनी स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्यासंदर्भातला उल्लेख केलेला आहे.
वाचा :-अखेर सचिन वाझे यांची विशेष शाखेत बदली
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरील भाजपाने विधिमंडळ अधिवेशनात सरकारला धारेवर धरलं होतं. हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल सवाल करतानाच मुकेश अंबानी धमकी प्रकरणाचे तत्कालीन तपास अधिकारी आणि गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. भाजपाकडून सातत्यानं मुद्दा लावून धरण्यात आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझे यांच्या बदलीची घोषणा केली होती. अखेर वाझे यांची आज बदली करण्यात आली आहे.
बदली करण्यात आल्यानंतर वाझे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय असा उल्लेख केल्याने खळबळ उडाली आहे. “तीन मार्च २००४. सीआयडीमधील काही जणांनी मला खोट्या आरोपांखाली अटक केली. या अटकेसंदर्भात अजूनही वाद आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होणार अशी शक्यता आहे. मला पुन्हा एकदा खोट्या आरोपांखाली अडकवण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये थोडा बदल आहे. आधी हे घडलं तेव्हा माझ्याकडे १७ वर्षांचा कालावधी होता. आशा होती, धैर्य होतं, आयुष्य आणि नोकरीमधील अनेक वर्ष शिल्लक होती. मात्र आता माझ्याकडे आयुष्याची पुढील १७ वर्षे शिल्लक नाहीयत तसेच नोकरीची एवढी वर्षे आणि अशा पद्धतीने जगण्याचं धैर्यही नाहीय. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ आलीय,” असं या स्टेटसमध्ये म्हटलं आहे.