‘केवळ पोलीस आयुक्तांची बदली करणे हे पुरेसे नाही, तर…’; चंद्रकांत पाटील आक्रमक
मुंबई – पोलीस अधिकारी सचिन वाझेंना अटक करण्यात आल्यानंतर अखेर राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केली. मात्र भाजपने ‘केवळ पोलीस आयुक्तांची बदली करणे हे पुरेसे नाही, तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी चंद्रकांतदादांनी केली आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 23,70,507 वर
कालपर्यंत उद्धव ठाकरे यांना वाझे हे लादेन वाटत नव्हते तर मग आज पोलीस आयुक्तांची बदली का केली? परमबीर सिंग यांची बदली केली याचा अर्थ हाच होतो की तेही यात दोषी आहेत. त्यामुळे सरकारने केवळ बदली न करता सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरुन चंद्रकांत पाटील यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक देवघेव झाल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत श्वेतपत्रिका जाहीर करा. कोणाच्या बदल्या झाल्या, किती दिवसात बदल्या झाल्या हे जनतेसमोर मांडा, असे खुले आव्हान त्यांनी दिले.