‘राज्यपालांची भूमिका संशयास्पद, राजभवन “भाजप” कार्यालय झालंय’…
मुंबई – राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असतानाच, दुसरीकडे त्यांनी काँग्रेसवरही आपला निशाणा साधला आहे. ‘राज्यातील काँग्रेसची भूमिका ही नेमकी काय आहे?’ असा सवाल त्यांनी उभा केला असून, राज्यतील काँग्रेसच्या नेत्यांमध्येच समन्वय नसल्याने, आपल्या भूमिकेबाबत ते गोंधळून गेले आहेत, अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे.
दरम्यान, यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची भूमिका ही संशयास्पद असून राजभवन हे भाजप कार्यालय झालं आहे,’ अशी बोचरी टीका पटोलेंनी राज्यपालांवर केली आहे.
वाचा :-#PhoneTapping: काँग्रेसचा हिस्सा किती विचारणाऱ्या फडणवीसांना नाना पटोलेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
तसचं, ‘वाटा आणि घाटा हे फडणवीस सरकारमध्ये सर्व जनतेने पाहिलं आहे. आरएसएसला कसा वाटा पुरवला गेला होता, आरएसएसची लोकं कशी प्रत्येक मंत्रालयात होती, फडणवीसांच्या मंत्रालयात आरएसएसची किती लोकं होती याचा आकडा आम्ही सरकारला जाहीर करायला लावणार आहोत. मी मुख्यमंत्र्यांना भेटून या गोष्टींवर चर्चा करणार आहे. जे भ्रष्टाचारात गुंतले आहेत तेच आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी भाजपवर केली आहे.
यावेळी फणवीसांनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या अधिकाऱ्यांचा संदर्भ घेऊन, ‘अधिकाऱ्यांनी कोणाची बाहुली बनू नये. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. फडणवीसांनी रश्मी शुक्लांचा उल्लेख केला. आता या पद्धतीच्या अधिकाऱ्यांचा वापर भाजप करत असेल तर ही गंभीर बाब आहे. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही,’ असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ‘महाराष्ट्राला बदनाम करण्याचा ठेका भाजपने घेतला असून, महाराष्ट्रातील जनता त्यांना माफ करणार नाही.
पटोलेंनी राज्यातल्या घडामोडींवरून काँग्रेसची भूमिका स्पष्ट करताना, ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे गंभीर आहेत. त्या प्रकरणाची सुस्पष्ट चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असं पटोले म्हणाले. परमबीर सिंग यांच्यावर विधान करताना, ‘मी जर सरकारमध्ये असतो, तर मी बदली केली नसती, परमबीर सिंह यांना निलंबित केलं असतं,’ असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. दरम्यान, नाना पटोले व काँग्रेसचे इतर आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत.