गँगस्टर सुरेश पुजारी उल्हासनगर पोलिसांच्या ताब्यात, केबल व्यावसायिक हत्या प्रकरणात घेतला ताबा
![Gangster Suresh Pujari arrested by Ulhasnagar police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Gangster-Suresh-Pujar.png)
ठाणे | कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारी याचा उल्हासनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २०१५ सालच्या केबल व्यावसायिक सच्चू कारीरा हत्याप्रकरणाच्या तपासासाठी पुजारीला उल्हासनगरला आणण्यात आले आहे.
केबल व्यावसायिक हत्या प्रकरणात घेतला ताबा
उल्हासनगरचे केबल व्यावसायिक सच्चानंद उर्फ सच्चू कारीरा यांच्यावर ११ सप्टेंबर २०१५ रोजी गोलमैदान परिसरातील त्यांच्या कार्यालयात घुसून गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात कारीरा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी स्वतः सुरेश पुजारी याने न्यूज चॅनेल्सना फोन करून स्वीकारली होती. या प्रकरणात सुरेश पुजारीसह एकूण १२ जणांच्या विरोधात मोक्का कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सुरेश पुजारी १५ वर्षांपासून परदेशात बसून गुन्हेगारी कारवाया करत असल्याने त्याला अटक करण्यात आली नव्हती.
त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीसही जारी करण्यात आली होती. २०२१ साली फिलिपाईन्स देशात त्याला अटक करून भारताच्या ताब्यात देण्यात आले. तेव्हापासून महाराष्ट्रात त्याच्याविरोधात दाखल असलेल्या २४ गुन्ह्यांचा क्राईम ब्रँचकडून तपास सुरू होता. यापैकी १५ गुन्हा मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतले, ७ गुन्हे ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतले, तर प्रत्येकी एक गुन्हा हा नवी मुंबई आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील आहे.
यानंतर उल्हासनगर पोलिसांनी त्याचा ताबा मिळावा यासाठी विशेष मोक्का न्यायालयात अर्ज करून सुरेश पुजारीचा ताबा घेतला. त्याला गुरुवारी १४ एप्रिल रोजी उल्हासनगरात आणण्यात आलं असून त्याची सच्चानंद कारीरा हत्या प्रकरणात स्वतः सहाय्यक पोलीस आयुक्त मोतीचंद राठोड हे चौकशी करणार आहे.