अखेर ठाणे जिल्ह्यातील ‘ती’ १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट मंजुरी
![Finally, approval for inclusion of 14 villages in Thane district in Navi Mumbai Municipal Corporation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-25-at-9.46.03-AM-1.jpeg)
मुंबई | नगरविकास विभागाने अखेर ठाणे जिल्ह्याच्या हद्दीतील महापालिकेलगतच्या १४ गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करायला मंजुरी दिली असून राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत तशी घोषणा केली. गेल्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांकडून नवी मुंबई महानगरपालिकेत ही गावे समाविष्ट करून घेण्याची मागणी करण्यात येत होती. या निर्णयामुळे गावांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांचा सुनियोजितपणे विकास करणे शक्य होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून १४ गावांना महानगरपालिकेत समाविष्ट करण्याचा मुद्दा चर्चेत होता. याबाबत अनेकदा सदनात प्रश्न उपस्थित केले गेले पण प्रत्येकवेळी शासन सकारात्मक असल्याचे सांगून पूढे काहीच ठोस घडत नव्हते. चालू अधिवेशनात पुन्हा एकदा १४ गावांच्या समावेशाचा प्रश्न आमदार प्रमोद पाटील, डॉ. बालाजी किणीकर, गणेश नाईक, रविंद्र चव्हाण यांनी मुद्दा उपस्थित केला होता. महिन्याभरापूर्वी सर्व तांत्रिक बाबी तपासून सकारात्मक निर्णय घेणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. त्यानंतर काल अखेर यासंबंधी अधिकृत निर्णय झाला आहे. दहिसर, निगु, मोकाशी पाडा, नावळी, भांडर्ली, पिंपरी गाव, घोटेघर, बांबली, उत्तरशिव, नागाव, नारिवली, वाकळन, बाळे आणि दहिसर मोरी ही १४ गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.
१४ गावांमध्ये ग्रामपंचायत असल्यामुळे वाढत्या नागरिकीकरणानुसार गावात सुविधा पुरवू शकत नाहीत. शहरीकरण झपाटय़ाने वाढत असल्याने हा विकास गावांतही व्हावा म्हणून अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षांपासून करत होते. काही वर्षांपूर्वी ग्रामस्थांच्या विरोधामुळे ही गावे महापालिकेतून वगळली होती. त्यानंतर ती पुन्हा समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. आधी गावे वगळा यासाठी हिंसक झालेले ग्रामस्थ नंतर महापालिका हवी अशी मागणी करू लागले होते.