बिनविरोध झाली नसती तरी जिंकून आले असते
ऋतुजा लटकेंनी मानले सर्वांचे आभार, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची बिनविरोध पोटनिवडणूक
मुंबई ।
माझ्या पतींनी नेहमी लोकांच्या सेवेसाठी जनकल्याण केले. लोकांच्या कल्याणाचा विचार केला, तोच विचार मी करणार आहे. अंधेरीचा विकास हाच माझा ध्यास असणार आहे. बिनविरोध झाली नसती आणि मी जिंकून आले असते तरी माझा अंधेरीचा विकास हाच ध्यास असता, असं अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटके म्हणाल्यात. भाजपचे अंधेरी पोटनिवडणुकीचे उमेदवार मुरजी पटेल यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय, त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसी संवाद साधलाय.
त्यांच्याबरोबर असलेल्या संबंधांमुळे मला आज आशीर्वाद मिळाला आहे. सर्व कार्यकर्त्यांचं आणि पदाधिकाऱ्यांचं हेच मत होतं की, ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. आता शेवटी शेवटी ती बिनविरोध झालेली आहे. त्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानेन, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.
माझ्याबरोबर जेवढे सगळे महिला आघाडीत आहेत, बंधू आणि सहकारी आहेत, आठ दिवस जे माझ्यासोबत धावपळ करतायत, त्या प्रत्येकाचे मी आभार मानेन. त्यांची मी ऋणी राहीन, माझे पती राजकीय क्षेत्रात असल्यानं त्यांचे प्रत्येकाशी चांगले संबंध होते. त्यामुळेच ही निवडणूक बिनविरोध झाल्याचंही त्यांनी सांगितलंय.
शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीवरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाले. ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला. शिवसेनेच्या पक्षनावासह चिन्हाचा वाद मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला. त्यामुळे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर दोन्ही गटांनी स्वतंत्र नाव आणि चिन्ह सादर केले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास सांगितलं, तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देत बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरण्यास सांगितलं.
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. तसंच शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली होती. बिनविरोध निवडणुकीची मागणी वाढल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये काल मध्यरात्री बैठक पार पडली. ही निवडणूक व्हावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. त्यानंतर आज मुरजी पटेलांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय.