दोन शाहिर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन करतात तसे दसरा मेळावे झालेत
![Dussehra gatherings are like two Shahirs entertaining people by fighting all night long](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Image-2022-10-06-at-5.02.13-PM-700x470.jpeg)
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणावरून टीका
भंडारा ।
मुंबईतील दसरा मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. आता मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री शिंदेच्या भाषणावरून पटोले यांनी टीका केली आहे.
दोन शाहिर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन करतात तसे दसरे मेळावे झालेत- नाना पटोले
भंडारा : दोन शाहिर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन करतात तसे दसरे मेळावे झालेत, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्याची खिल्ली उडविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात वाचून भाषण करत होते. म्हणजे याचच अर्थ नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी लिहिलेली भाषण ते वाचत होते. असं चित्र महाराष्ट्राने पाहिलं. पण काँग्रेसला अशा पद्धतीच्या तमाशात कुठलाही रस नाही, अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.
मुंबईत बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदात टीका केली. उद्ध ठाकरे यांच्या मेळाव्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते असल्याच्या तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत ठाकरे समर्थकांचा भरणा असल्याच्या आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना नाना पटोले यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. दोन शाहिर रात्रभर भांडून लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले. एकनाथ शिंदेंनी दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचून दाखवली. काँग्रेसवर आरोप तोही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रींनी करणं हे हास्यास्पद असल्याचं नाना पटोले म्हणाले. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची पाठराखण पटोले यांनी केली.
देशाच्या समोर आणि राज्याच्या समोर अनेक प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. याविषयावर सरकार का बोलत नाही? आपल्याकडे तमाशा पद्धत आहे. दोन शाहिर रात्रभर एकमेकांवर टिपणी करतात आणि लोकही त्यांची गंमत बघण्यासाठी जातात. तो विचार ऐकण्यासाठी जात नाही. तसं या महाराष्ट्रात एक प्रकारे मनोरंजनाचा कार्यक्रम या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सुरू झाला असावा, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.
केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असून हे सरकार जाणार आहे. त्यामुळे किती, कोणाला पद वाटायचे वाटून घ्या, असा खोचक टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद बुलडाण्याचे खासदार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आले. त्यावर ते बोलत होते.