#COVID-19: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा…कोरोना रुग्णांची संख्या वाढणार: आरोग्यमंत्री राजेश टोपे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/16.jpg)
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
मुंबईकरांसाठी आता धोक्यांची घंटा आहे. मुंबईतील करोनाग्रस्तांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ वर पोहोचली असून पाच हजारांपेक्षा अधिक जण हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबई महापालिकेच्या वॉर रुमला भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे बैठक घेतली. या बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
राजेश टोपे म्हणाले की, “मुंबईतील करोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. पाच हजारांहून अधिक जण असे आहेत जे अशा लोकांच्या संपर्कात आले असून हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मध्ये आहेत. ही संख्या आता ५३४३ इतकी आहे. या सर्वांना विलगीकरणात ठेऊन चाचणी केली जाणार आहे. सध्या सर्वांवर लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोक या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत”. दरम्यान मुंबईतील वाढता आकडा चिंतेची बाब आहे. पुढे हे आव्हान कसं पेलायचं यासंबंदी बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.
करोनाचे रुग्ण वाढले आहेत पण त्याचं संक्रमण वाढू नये यासाठी पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. जे लोक हाय रिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांच्यावर पूर्ण बारकाईने लक्ष ठेवलं जात आहे. चार हजार लोकांच्या माध्यमातून परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.