#CoronaVirus: करोनामुळे धर्म, ईश्वर सगळेच निरुपयोगी झाले, आता… : खासदार संजय राऊत
चीनमध्ये उपद्रव करणाऱ्या करोनानं जगभरात थैमान घातलं. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांच्या माध्यमातून करोनानं भारतातं पाऊल ठेवलं. हळूहळू करोनाचा प्रभाव वाढत चालला असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या संकटावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दीर्घ भाष्य केलं आहे.
महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा ७४वर पोहोचला आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जवळपास लॉक डाऊन करण्याची तयारी सुरू आहे. करोनाच्या विषाणूनं मानवी अस्तित्वाला आव्हान दिलं असून, संजय राऊत यांनी रोखठोक या सदरातून त्यावर भाष्य केलं आहे आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
करोना व्हायरसच्या विळख्यात जग तडफडताना दिसत आहे. जगाची इतकी तडफड दुसऱया महायुद्धातही दिसली नव्हती. स्वतःस ‘सुपर पॉवर’ समजणारे बहुतेक सर्व देश करोना व्हायरसपुढे हतबल झाले आहेत. चंद्रावर आणि मंगळावर ‘पाय’ ठेवणाऱ्या अमेरिकेत राष्ट्रीय आपत्ती आणि आणीबाणीच जाहीर केली आहे. साऱ्या जगावर एकेकाळी राज्य करणाऱ्या ग्रेट ब्रिटनने तर स्वतःला कोंडून घेतले आहे. सम्राज्ञी एलिझाबेथ यांना त्यांच्या राजप्रासादातून ‘वेगळे’ केले आहे. अनेक मोठ्या देशांत हे घडत आहे. निसर्गाने मानवी अहंकाराचा, देव-धर्माचा केलेला हा पराभव आहे. संकटकाळी माणूस देवाला शरण जातो. करोनामुळे उलटेच झाले आहे. धर्म हा तर सध्याच्या राजकारणाचे सगळ्यात मोठे भांडवल झाले आहे, पण ‘करोना’ प्रकरणात स्वतः देवांनाच विषाणूंपासून संरक्षण द्यायची वेळ आली. हिंदू, इस्लामी, बुद्ध असे सर्वच धर्मीय देश जणू मरून पडले आहेत. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील ‘देवळे’ करोनाच्या भीतीने बंद करावी लागली. भक्तांचा ओघ आहे म्हणून मंदिरातील दगडी मूर्तींना देवत्व प्राप्त होते. भक्तांचा ओघच थांबला. त्यामुळे कसले देव आणि कसले देवत्व? महाराष्ट्रात ‘करोना’ व्हायरस वाढू नये म्हणून सिद्धिविनायक मंदिर बंद केले. तुळजापूरचे भवानी मातेचे मंदिर, कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, त्र्यंबकेश्वरचे मंदिर बंद केले आहे. शिर्डीत शुकशुकाट आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिर बंद करण्यात आले आहे. देवांनी अनेक असुरांचा वध केला असे पुराणात सांगितले गेले, पण एक विषाणू देवांवर भारी पडला.